रत्नागिरी : ‘स्त्री सुसंस्कृत असेल, तर तिच्यामुळे मुले व घर सुधारते. त्यामुळे स्त्रीने व्यवसाय केला, तर सारे कुटुंबही या व्यवसायात मदत करते. बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थिनी, गृहिणी, मुली शिकल्यानंतर त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू करून किमान चार जणींना नोकरी द्यावी. म्हणजे या केंद्राचा उद्देश सफल होईल. या केंद्रातून जास्तीत जास्त उद्योजिका घडाव्यात,’ असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांनी केले.
महर्षी कर्वे संस्थेतर्फे शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्हमध्ये हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर फॅशन डिझायनर निवेदिता साबू, उपकार्याध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, स्थानिक समिती कार्याध्यक्ष प्रकाश सोहनी, व्यवस्थापन समिती सदस्य विद्या कुलकर्णी उपस्थित होत्या.
निवेदिता साबू म्हणाल्या, ‘मी एका शिलाई मशीनपासून व्यवसायाला सुरुवात केली. गेली १७ वर्षे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आहे. महिला सक्षमीकरणासाठी होणारे हे केंद्र नक्कीच महत्त्वाचे आहे. दर वर्षी हजारो फॅशन डिझायनर व हॉटेल मॅनेजमेंट करणारे तरुण, तरुणी बाहेर पडतात. उद्योजकांनाही कौशल्यवानांची गरज असते. या प्रकल्पातील पहिल्या किमान पाच विद्यार्थिनींनी माझ्या फॅशन डिझायनिंग व्यवसायात यावे. मला या व्यवसायात १७ वर्षे लागली; पण आता खूप कौशल्ये आत्मसात करून जागतिक संधी लवकरात लवकर मिळवणे शक्य आहे.’
प्रा. पाटील म्हणाले, ‘संस्था १२५व्या वर्षात पदार्पण करताना युगानुरूप अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न आहे. कोकणात मागणीनुसार अभ्यासक्रम दिले आहेत. आगामी काळात मत्स्यप्रक्रिया, किनारपट्टीशी निगडित अभ्यासक्रमही सुरू केले जातील.’
हॉटेल व पर्यटन व्यावसायिक कौस्तुभ सावंत म्हणाले, ‘आठ महिन्यांपूर्वी या अभ्यासक्रमांसंबंधी संस्थेसोबत बैठक झाली होती. कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आम्ही सुचवले होते. ते प्रत्यक्षात येत असून आम्ही आमच्या व्यवसायात या विद्यार्थिनींना नक्की संधी देऊ. ‘डेस्टिनेशन रत्नागिरी’ घडवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.’
डॉ. हुंडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले, ‘१५ डिसेंबरपासून अभ्यासक्रम सुरू होतील. स्त्रियांपुढील बदलत्या आव्हानांना पेलण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी केंद्र काम करेल.’
नूपुर पटवर्धन आणि मंगला नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. कश्मिरा सावंत हिने शारदास्तवन केले. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. भावे यांनी आभार मानले.
मातृशक्तीचा सन्मान
‘रत्नविहार’च्या नूपुर पटवर्धन, उद्योजिका आदिती देसाई, अमृता ट्रॅव्हल्सच्या अमृता करंदीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे, ‘व्यंकटेश डायनिंग’च्या ममता नलावडे यांचा निवेदिता साबू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाया कर्वे केंद्रासाठी मेहनत घेणाऱ्या डॉ. मंजू हुंडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.